टिओडी मराठी, नगर, दि. 27 जून 2021 – आम्ही राजकारण करत नाही. नगर दक्षिणचा आणि नगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन कोणाशीही आघाडी करायला तयार आहोत. ही आघाडी आमच्या स्वार्थासाठी नाही. जनतेच्या हितासाठी आहे. एवढेच मला यातून सांगायचं आहे, असे वक्तव्य खासदार डॉ सुजय विखे यांनी रविवारी केलं आहे.
महानगरपालिकेच्या माध्यमातून अडीच वर्षांत केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी माऊली सभागृहामध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहराध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेमध्ये आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला ही वस्तुस्थिती आहे. आम्ही अडीच वर्षांच्या कार्यकाळात कामे केली. ती आता जनतेसमोर मांडण्याच्या आम्ही निर्णय घेतला आहे, असं डॉ. विखे यांनी सांगितले.
अमृत योजना, भुयारी गटार योजना व शहरातील प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचा विषय आम्ही आमच्या कार्यकाळात मार्गी लावू शकलो. अमृत योजनेचे काम झाल्याने नगर शहराला 24 तास पाणी आता मिळणार आहे. योजनेचे साधारण 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. पुढच्या ६ महिन्यात ही योजना पूर्ण होईल, असे डॉ. विखे यांनी म्हटलं.